नागपंचमी : श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन नागासह वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. नाग हे द्रविड लोकांचे दैवत होते पण आर्य व द्रविड यांच्या मिश्रणानंतर नागपूजा सर्वत्र सुरू झाली, असे म्हणतात. मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा एक भयंकर प्राणी आहे. म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली, तर त्यापासून भय राहणार नाही, या कल्पनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी. हा सण मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. या दिवशी प्रत्यक्ष नागाची पूजा करतात किंवा नागाची मातीची प्रतिमा करून अथवा रक्तचंदनाने वा हळदीने पाटावर नवनागांच्या आकृती काढून त्यांची पूजा करतात. गारुडी लोक खरे नाग घेऊन घरोघरी हिंडतात. लोक नागाला दूध, लाह्या इ. पदार्थ वाहून त्याची पूजा करतात. स्त्रिया व मुली या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची वा मंदिरात जाऊन नागाची प...