Skip to main content

श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन ( जिल्हा - रायगड ) / Shree Kshetra Harihareshwar, Shrivardhan ( District - Raigad )


श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन ( जिल्हा - रायगड )

ऐतिहासिक माहिती
श्रीमंत पेशवे ( भट घराणे ) यांचे श्री हरिहरेश्वर कुलदैवत होते. त्यामुळे अर्थातच श्रद्धा स्थान होते. पूर्वीच्या इतिहासकारांचे म्हणण्यानुसार सन १७२३ मध्ये श्रीमंत पेशव्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. तीर्थावरील प्रदक्षिणेसाठीच्या मुळच्या पायऱ्या जावळीचे सुभेदार चंद्रराव मोरे यांनी बांधल्या. जीर्णोद्धाराचा उल्लेख आजमितीस श्रीकालभैरव मंदिर प्रवेशद्वारावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज देखील येथे दर्शनास येत असत. शेवटचे दर्शन महाराजांचे सन १६७४ साली झाल्याचा उल्लेख आहे. त्यावेळच्या उल्लेखातील एक महत्त्वाचा उल्लेख करावा असे वाटते. सन १७५६ मध्ये इंग्रज व पेशवे यांच्यात तह झाला. त्यावेळी इंग्रजीनी श्री हरिहरेश्वरची मागणी केली. परंतु रामाजीपंत किल्लेदार यांनी ठणकावून सांगितले की, हिंदू जनता आपली मुंडकी देईल परंतु हरिहरेश्वर देणार नाही. या विरोधामुळे अखेर हरिहरेश्वर क्षेत्र कारभाराचे दृष्टीने जंजिरा संस्थानकडे गेले.

देवाला नवस बोलायची प्रथा फार पूर्वीपासूनच आहे. श्रीमंत पेशवे पोटदुखीने आजारी असताना देवाला नानासाहेब पुरंदरे यांनी नवस केला. व्याधी निवारण झाल्यास आम्ही श्रीचरणी सोन्याचा मुखवटा वाहू. त्यानुसार पुढे श्रीमंत पेशव्यानी १७३३/३४ चे दरम्यान श्री कालभैरवास मुखवटा अर्पण केला. अशी अनेक उदाहरणे आजही पहावयास मिळतात. पेशव्यानी सन १७३३ पासून उत्सवाचे वेळी तोफ वाजविण्यास सुरुवात केली. ४ एप्रिल १७७२ मध्ये श्री हरिहरेश्वरचे दर्शनासाठी श्रीमंत रमाबाई येऊन गेल्या. त्याचवेळी त्यांनी चौघडा सुरु केला. त्यावेळी त्यांचा यात्रा खर्च २५२६ रु. झाल्याचा उल्लेख आज आपणास जुन्या बखरीत पहावयास मिळेल. १८२० पर्यंत या देवस्थानचा सर्व खर्च श्रीमंत पेशवे सरकार पहात असे. पुढे ब्रिटिश सरकार पाहू लागले. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर २ में १९५३ साली ट्रस्ट निर्माण झाला व आजमितीस विश्वस्त सर्व कारभार पहात आहेत.

पौराणिक माहिती
हरिहरकथा - पूर्वी विंद्य पर्वत गर्वाने फुगून एकसारखा वाढू लागला. त्याचे वाढणे पाहून देवानांसुद्धा चिंता उत्पन्न झाली. अशावेळी पर्वतांचे गुरु अगस्ती यांना पाचारण करणे याखेरीज दुसरा कोणता ही उपाय नव्हता. सर्व देवांनी काशीपुरात जाऊन अगस्ती ऋषींची प्रार्थना केली. त्याला अनुसरुन अगस्ती महामुनी विद्याद्रीच्या मार्गात आले. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने विद्याद्रीचे वाढणे थांबविले. मात्र याकामी महामुनींना काशीक्षेत्र सोडावे लागले. अर्थात त्यांना याचे फार मोठे दुख: झाले. पुढे मार्गक्रमण करता करता दक्षिणेकडील लोहपर्वतावर आले. त्यांच्या सोबत त्यांची धर्म पत्नी लोपामुद्रा होती. फिरता फिरता त्यांची षण्मुख स्वामींची भेट झाली. स्वामीनी आश्रमामध्ये त्या उभयतांना आणून त्यांचे आनंदाने आदरातिथ्य केले. त्यांचे ते स्वागत पाहून महामुनी अगस्तीनी स्वामींना प्रश्न केला ? सावित्रीच्या उत्तरतिरी सागर तीरावर एक हरिहर नावाचे उत्तम असे क्षेत्र आहे . तरी त्याचा महिमा मला कृपा करून कथन करावा. हा प्रश्न ऐकून अतिशय आनंदीत होऊन षण्मुखस्वामी वर्णन करु लागले.

पूर्वी पदमकल्पांत एक महाबळ नावांचा दैत्य झाला. त्याचाच लहान भाऊ अतिंबळ नावाचा अतिशय पराक्रमी होता . त्याकाळी गर्वाने अतिशय उन्मत होऊन त्या दोघा राक्षसानी संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली. एवढ्याने त्याचे समाधान न होता, पृथ्वीवरील सर्व साधूसत, ऋषी, स्त्रीया, मानव यांचा ते नानाप्रकारे छळ करु लागले अर्थात सर्व त्रासाला कंटाळून सर्व ऋषींनी, साधूसतानी देवांची प्रार्थना करण्यास सुरुवात केला. सर्वांची विनंती ऐकून ब्रह्मा, विष्णु, महेश लढण्यास सज्ज झाले. भगवान महाविष्णूनी अतिबलावर अनेक शस्त्राचा मारा करून मारून टाकले. आपल्या भावाचा झालेला पराभव पाहून महाबळ सतापून विष्णूवर चाल करून युद्धामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा टिकाव लागणे कठीण वाटू लागले. अखेर देवांनी आदीमायेची स्तुती करण्यास प्रारंभ केला. प्रसन्न झालेल्या आदिमायेने अतिबळावर मोहिनी घालून त्याचे गर्वहरण केले. दैत्याने आपला देहच ब्रह्मा , विष्णू , महेश यांना अर्पण केला. दैत्याचे पोटऱ्यांवर ब्रह्मा, बक्षावर ( छातीवर ) विष्णू व मस्तकावर शिव ( शंकर ) विराजमान झाले. त्यांनी दैत्यांची प्रशंसा केली . तेच स्थळ म्हणजे आजचे महाबळेश्वर ओळखले जाते.

महामुनी अगस्ती आनंदीत होऊन त्यांनी पुढे प्रश्न केला की, स्वामी या ठिकाणी कृष्णा व सावित्री या नद्या कशा उगम पावल्या ते आपण कृपा करून सागा. स्वामी सांगु लागले अतिबळ व महाबळ यांच्या त्रासातून सर्वांना मुक्त केल्यावर सर्वांना सुखस्वास्थ्य लाभावे यासाठी ब्रह्मदेवांनी विष्णू व शंकरासह महायाग करण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व तयारी सुरु झाली सर्व साधनसामुग्री जमा करण्यात आली मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व देवताना पाचारण करण्यात आले. सर्व देव यज्ञाकरीता उपस्थित झाले. सर्व आनंदमय वातावरण पाहून आनंदीत होऊन मंगल वाद्ये वाजू लागली यज्ञाकरीता ब्रह्मदेवाची ज्येष्ठ पत्नी सावित्री ही येणार होती. मुहुर्ताची वेळ जवळ आली. सर्व जण सावित्रीची आतुरतेने वाट पाहात होते. परंतु सावित्री मात्र यज्ञाला साजेसा साज शृंगार करण्यात मग्न होती.

मुहूर्ताची वेळ जवळ आली पुरोहितांनी ब्रह्मदेवानां विनंती केली. मुहूर्त टळण्याची शक्यता वाटू लागली. तेव्हा भगवान विष्णूंनी क्षणाचाही विलंब न करता ब्रह्मदेवाची कनिष्ठ पत्नी गायत्रीला यज्ञाला बसायची आज्ञा केली. गायत्री मात्र भयभीत होऊन अखेर ब्रहदेवांचे शेजारी स्थानापन्न झाली. यज्ञाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. मंगलवाद्ये जोरजोराने वाजू लागली. देवदेवतांनी, महानुनींनी जयघोष चालू केला सर्व आकाश पृथ्वी दुमदुम लागली. सर्व काही आनंदून गेले. हा सारा प्रकार सावित्रीचे कानी गेला. याग सुरु झाल्याचे लक्षात येताच ती रागाने लाल होऊन यज्ञाचे ठिकाणी आली. तिच्या सर्व प्रकार लक्षात आला व तिने रागाने भगवान विष्णूंसह सर्वांना शाप दिला. तुम्ही माझा अपमान केलात मी धर्मपत्नी असूनही निर्दयपणे मला बाजूला ठेवलात तेव्हा तुम्ही जलरूप व्हाल ! स्त्री नावाने तुम्हाला संबोधले जाईल, तसेच गायत्रीला शाप दिला तू सुद्धा यांना सामील झालीस तेव्हा तू कोणासही दिसणार नाहीस. या शापाचा परिणाम म्हणूनच महाबळेश्वरला जो पंचगंगांचा उगम आहे तो याप्रमाणे :
१ ) विष्णू ( कृष्ण ) कृष्णेच्या रुपाने
२ ) शिव ( शंकर ) वेण्ण्याच्या रुपाने
३ ) ब्रह्मा कुकूपद्मावतीच्या रुपाने ( कोयना )
४ ) सावित्री सावित्रीच्या रुपाने
५ ) गायत्री गायत्रीच्या रुपाने
याप्रमाणे सर्व नद्यांचा झाला.

यातील फक्त गायत्री व सावित्री पश्चिम दिशेने वाहू लागल्या. हे सर्व करून सावित्री शांत न होता अतिशय गर्वाने कड्यावरुन उडी घेत घेत पश्चिम दिशेला चालू लागली. वाटेत श्रीकृष्णाने तिला समजावण्याचा अतिशय प्रयत्न केला. ब्रह्मदेवांनी सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने शांत होऊन सावित्री भगवान श्रीकृष्णाला म्हणाली, ब्रह्मदेवाने निर्माण न केलेल्या भूमिवर माझे हातून यज्ञ व्हावा. क्षणभर विश्वपती श्रीकृष्णाने विचार केला व दोघेजण पर्वतरुप धारण करून सावित्रीला सामोरे गेले. तेच हे हरिहर पर्वत, पुढे लगेचच ब्रह्मदेवानाही त्यांनी बोलावून पर्वतरुप धारण करण्यास सांगितले पुढे याच ब्रह्मपर्वताचे कडेला समुद्रकिनारी ब्रह्मदेवांनी सावित्री सह मोठा यज्ञ केला व सर्व आनंदमय वातावरण झाले. आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हे सर्व श्रवण करून अगस्तीमुनी अतिशय आनंदीत झाले, व ते हरिहर पर्वताचे दिशेने निघाले. हरिहर पर्वतांना पाहताच महामुनींना फारच आनंद झाला. ते पर्वतरुपी हरिहराची सेवा करण्यात मग्न झाले. त्यांच्या सेवेने प्रसन्न होऊनच श्री हरिहरेश्वरांनी पार्वतीसह त्यांना साक्षात दर्शन दिले. अगस्तीमुनींना सुद्धा अतिशय आनंद झाल्याने त्यांनी देवांची प्रार्थना करून विनंती करून सांगितले आपण सर्वांनी लोक कल्याणासाठी येथेच रहावे.

देवांनी विनंती मान्य करून तथास्तु म्हटले व लिंगरुप धारण केले. तेच आजचे स्वयंभू स्थान श्री हरिहरेश्वर ( ब्रह्मा, विष्णू, महेश व आदिमाया पार्वती ) हे होय. याच ठिकाणी आजही आपण प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतो.

श्री कालभैरव कथा - ॐ श्री हरिहरेश्वराचे पश्चिम दिशेला श्री कालभैरवाचे स्थान आहे. उत्तर काशीला ज्याप्रमाणे श्री कालभैरवाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे येथेही आहे. अर्थात दर्शन सुद्धा प्रथम श्री कालभैरवाचेच करायचे अशी परंपरा आहे.

पूर्वी दिलीप राजाने वशिष्ठ मुनींना या श्रीकालभैरवाची अख्यायिका विचारली. त्यावेळी मुनीश्रेष्ठ सांगतात - पिशाच्चाना मुक्ती देण्यासाठी श्री शंकरानी भैरवरूप धारण केले. पूर्वी वराह कल्यान्त शतघ्न नावाचा दैत्य होतो. तो अतिशय पराक्रमी व बलवान होता. तो सर्वांना या ना त्या कारणाने त्रास देत असे. गोब्राह्मणादी सर्वांना विनाकारण त्रास देत असे. अशावेळी सर्व देवानी श्री शंकरांना विनंती केली. त्या विनंतीला मान देवून श्री शंकरांनी अतिशय उग्ररुप धारण केले तेच हे श्री कालभैरव रुप होय. त्यानंतर त्यांनी शतघ्नाचा वध करून सर्वाना त्रासातून मुक्त केले. याचवेळी श्री शंकरानी ( हरिहरानी ) श्री कालभैरवास वर दिला आहे. आज तू फार मोठे असे कार्य केले आहेस तेव्हा सर्व भक्तगण माझ्या दर्शनाला येताना तुझे दर्शन प्रथम घेतील, ( हिच प्रथा वाराणशीला, काशीला सुद्धा आहे. )

शतघ्नाचा वध करण्यासाठी कालभैरवास योगमायेचे स्मरण करावे लागले व त्यापासूनच त्यांना शक्ती लाभली. तिच आजमितीस योगेश्वरी म्हणून जवळ आहे. ( योग मायेने साध्य केलेली शक्ती देवता ) श्री कालभैरव - योगेश्वरीचे दर्शनाने, कृपेने, पिशाच्च बाधा, रोगराई , पीडा-बाधा, दुख: दूर होतात. असा चमत्कार आजही प्रत्ययास येतो. प्रथम श्री कालभैरवाचे दर्शन नंतर श्री हरिहरेश्वर यांचे दर्शन करून परत श्री कालभैरवाचे दर्शन घेतात. दर्शनाने सर्वांच्या इच्छा, मनोकामना परीपूर्ण होतात. दुःख, रोग नाहीसे होतात . याचा प्रत्यय आज सुद्धा माणसांना येत आहे .

क्षेत्राची परीक्रमा करण्याची पद्धत - येथे डोंगररुपाने ब्रह्मा, विष्णु, महेश व आदीमाया पार्वती असे वसले आहेत. त्यापैकी ब्रह्मदेवाचे पर्वताची प्रदक्षिणा करणे तसे सोपे आहे.

ही प्रदक्षिणा ४५ ते ५० मिनिटांत होऊ शकते. ( भरती - ओहोटी पाहून ) प्रदक्षिणा संपूर्ण समृद्राचे तीरावरून खडकावरून करावी लागते. प्रदक्षिणेच्या मार्गावर येणारी तीर्थस्थाने :
( १ ) विष्णूपद गयेला ज्याप्रमाणे विष्णूचे पाऊल आहे. त्याचाप्रमाणे येथे सुद्धा खडकावर भगवान विष्णूचे पाऊलाचा आकार आहे. तेच विष्णूपद आहे.
( २ ) शुक्लतीर्थ-विष्णुपदाचे दक्षिणेला खाली समुद्रामध्ये एक कुंड आहे. तेच शुक्लतीर्थ होय. येथे स्नान केल्याने मानवाच्या सर्व पापांचा नाश होतो. या तीर्थांचे स्पर्शाने सुद्धा मानवाच्या पापांचा नाश होतो असा उल्लेख सह्याद्री खंडात आहे. ( आजमितीस शुक्लतीर्थात स्नान करताना धोकादायक आहे. )
( ३ ) गायत्रीतीर्थ समुद्राचे किनारी ब्रह्मदेवाचे डोंगरात उगम पावलेली गायत्री सुक्ष्म रुपाने आहे. आजही सुक्ष्म स्वरुपात गोड पाण्याचा झरा आहे. हा ही एक चमत्कार पहावयास मिळतो. ही गायत्री शापीत असल्यामुळे ती महाबळेश्वरला उगम पाहून सुद्धा गुप्त रुपाने येथे प्रकट झाल्याचा उल्लेख पहावयास मिळतो. तेथील तीर्थ प्राशन करावे. म्हणजे रोगराई, पीड़ा, बाधा दूर होतात . हे स्थान डोंगराचे कपारीमध्ये आहे. यानंतरची तीर्थस्थाने समुद्रांमध्ये असल्याने ओहोटीचे वेळी गोलाकार कुंडे पहावयास मिळतात.

चक्रतीर्थ, सुर्यतीर्थ, नागतीर्थ, कमंडलूतीर्थ, गौतमतीर्थ, गौरीतीर्थ इ. पुढे आल्यावर पांडवतीर्थ म्हणून खडकावर दोन छोटी कुंड आहेत. हेच पांडवतीर्थ होय. पांडवानी आपल्या पितरांची श्राद्धकार्मे येथे केली. तेच हे स्थळ पांडवतीर्थ. आजही श्राद्धादी कार्ये येथेच केली जातात.

सन्दर्भ :
पुस्तक - श्री क्षेत्र हरिहरेश्वर दर्शन
प्रकाशक - श्रीदेव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान

Instagram - TRAVELWALA.CHORA

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...