Skip to main content

लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ?


लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ?
असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं !

देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं‌ रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे.

मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ‌. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे.

त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला. त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण जाणतोच की, कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं मातापित्यांना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकले. आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला. या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी इथे झालेला मोदकाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. अर्थात आपण सध्या ज्याला रूढार्थानं मोदक म्हणून खातो तोच तो दिव्य मोदक याचं स्पष्टीकरण मिळत नाही.

दुसरी कथा असं सांगते की, अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिनं आदरभावानं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनास आमंत्रित केलं. विविध प्रकारची पक्वान्नं त्यासाठी सिद्ध केली गेली. पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना. अडचणीत सापडलेल्या अनसूयेनं विचार केला की गोड पक्वान्नानं गणपती बाप्पांचं पोट निश्चितच भरेल. तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्यम्! त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पांचं पोट भरलं. त्यांनी २१ ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली. देवी पार्वतीनं कुतुहलानं अनसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव‌ विचारले. तोच हा मोदक. आणि तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो, असं ही कथा सांगते.

उकडीचे मोदक कुठून आले ?
अशाप्रकारे पुराणकाळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही. याचं कारण म्हणजे एकतर पुराणातील वांगी पुराणात शोभतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थानं लाडवांनाही मोदक म्हटलं जायचं. त्यामुळे तांदळाची उकड, आत खोबरं आणि गुळाचं गोड चूण ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराणकाळातून अलिकडच्या काळाकडे यावं लागेल.

इसवीसन ७५० ते १२०० या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ होऊ लागल्याच्या खाणाखुणा दिसतात. त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं. नारळाचं चूण आणि उकड असा अचूक उल्लेख एकेठिकाणी आढळतो. पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर 'ठडुंबर' असा केलेला दिसतो.

त्यानंतर आहारविषयक ग्रंथात 'वर्षिल्लक' नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मेळ खाते. पण तिच्यात दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे आणि त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह सद्य नाम धारण करून मोदक अवतरतो.

इतर प्रांतातले मोदक !
मधल्या काळातले धागेदोरे अधांतरी असले तरी काही संदर्भ जोडता येतात. आपल्याकडच्या अनेक पाककृती मूळ वेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याच पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झालेल्या दिसतात. मोदक ही पाककृती तांदूळबहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात.

तमिळ 'मोदक' किंवा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'कडबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' अशी त्याची अनेकविध नावं आहेत. उकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कोळकटै हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. ओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात. म्हणजे साहित्य तेच पण आकार आणि नाव वेगळं.

प्राचीन काळापासून भारतभरात पुजेसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वापरला जातो. बारकाईने पाहिलं तर मोदकांचा आकार हा श्रीफलासारखा दिसतो. पुजेतला नारळ आणि गूळ खोबरं यांचा यथोचित संगम साधत कुणा भक्तानं किंवा सुगरणीनं ईश्वराप्रती व्यक्त केलेला कल्पक आणि गोड भक्तीभाव म्हणजे मोदक. जिथं जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात. ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं चूण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो.

आज मोदकाच्या आतल्या सारणाचं वैविध्य लक्षणीयरित्या बदललं आहे. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू ,आंबा, चॉकलेट, सुकामेवा इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं मोदक तयार होतात की त्याला दाद द्यायलाच हवी. तरीही गणपती बाप्पा घरी विराजमान झाल्यावर नैवेद्यात पारंपरिक मोदकांचं स्थान अबाधित आहे. मोदक वळता येणं ही कला आहे. केवळ सगळं साहित्य मोदकाचं आहे म्हणून कसाबसा वळलेला लाडूसदृश मोदक जिव्हातृप्ती करत नाही कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून अधिक गंमत आणतो.

पांढरीशुभ्र उकडीची पारी, आतलं मिट्ट गोड चूण यांच्या आकार आणि प्रमाणाचं गणित अचूक जुळावं लागतं. मग कळीचं फूल व्हावं तशी पारीची एकेक कळी खुलवत तयार कळीदार मोदक आणि वर तुर्रेबाज टोक गाठणं ही एक कला आहे. त्या आकाराच्या प्रेमात पडून वर तुपाची धार घेत किती मोदक गट्टम होतात याची बेरीज अस्सल खवय्या करत नाही. त्यावेळेपुरतं बाप्पासारखं विशाल मन आणि उदर आपल्याला आपसूक प्राप्त होतं.

- रश्मी वारंग ✍
( बीबीसी मराठीसाठी )

Comments

Popular posts from this blog

पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे - पुणे गणेशोत्सव 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darshan 14. Bholenath Mit

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या व

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस