Skip to main content

रास्ते वाडा, सोमवार पेठ - पुणे / Raaste Wada, Somwar Peth - Pune


रास्ते वाडा, सोमवार पेठ ( पुणे )
दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशनकडे जाताना थोडे पुढे गेल्यावर समोरच एक भव्य वाडा दिसतो. हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तेथपासून अपोलो टॉकीजच्या चौकापर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील प्रमुख सरदार आनंदराव रास्ते यांचा हा वाडा. सध्या वाड्याच्या दर्शनी भागात तळमजल्यावर काही दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शाळेची पाटी दिसते.

पेशवाई जाऊन शतके उलटली, सरंजामतनखा जाऊनही दशके उलटली. त्यामुळे रास्ते सरदारांच्या वंशजांना बदलत्या काळाबरोबर बदलणे भाग पडले. साहजिकच त्यांनी वाड्याच्या दक्षिणेकडील बाजूस म्हणजे अपोलोकडून के.ई.एम. कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस ओनरशिप फ्लॅट उठविले. पुणे शहराच्या पूर्व भागातील या वाड्याला पूर्वीच्या काळी आंबील ओढा वळवून पाणीपुरवठा केलेला होता. वाड्याच्या आत सरदार रास्त्यांनी बांधलेले श्रीरामाचे सुरेख देऊळ आहे. हाच ' रास्त्यांचा राम '.

वाड्याप्रमाणेच रास्ते घराण्याचा इतिहासही पाहण्यासारखा आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई हिचे माहेर रास्ते घराण्यातले. विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही त्यांची तीन मुले. त्यापैकी थोरले विश्वासराव १७६१ च्या पानिपतच्या संग्रामात गोळी लागून ठार झाले व त्यांचे चुलते सदाशिवरावभाऊ हेही गारद झाले. २३ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशवे यांनी ' भाऊ भाऊ ' असे म्हणत पर्वतीवर प्राण सोडल्यावर माधवराव पेशवाईची वस्त्रे मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षापासून राक्षसभुवनच्या लढाईपर्यंत माधवराव मातोश्री गोपिकाबाईंच्या सल्ल्याने निर्णय घेत. परंतु राजकारणाचा एकंदर आवाका आल्यावर ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले. तडफदार, निःस्पृह व निःस्वार्थी माधवरावांचे काही निर्णय अर्थातच कठोर होते. असाच एक निर्णय त्यांच्या मातुल घराण्याविषयी असल्याने माता पुत्रात कायमचे वितुष्ट आले.

त्याचे असे झाले, की निजामाचा बंदोबस्त करण्याच्या कामी सरदार रास्त्यांनी कुचराई करून पेशव्यांच्या हुकमाचा भंग केला. इतकेच नव्हे, तर मल्हारराव रास्ते दादासाहेबांच्या, म्हणजे राघोबादादांच्या पक्षास मिळाले. म्हणून माधवराव पेशव्यांची त्यांच्यावर इतराजी होऊन त्यांनी सरदार रास्ते यांचा सरंजाम जप्त केला. ही गोष्ट गोपिकाबाईंना मुळीच रुचली नाही म्हणून त्यांनी माधवरावाकडे रदबदली करून निर्णय मागे घेण्यास सुचविले. निग्रही माधवरावांनी कठोरपणे निर्णय कायम ठेवला. त्यामुळे खुद्द आपल्या चिरंजीवावर रुष्ट होऊन गोपिकाबाई नाशिकजवळील गंगापूर येथे जाऊन राहू लागल्या. पुण्यास परत येण्याविषयी चिरंजीव माधवरावांनी, तसेच नाना फडणीसांनी अनेकदा आर्जवे केली; परंतु बाई पुण्यास परत आल्या नाहीत. १७७१ मध्ये माधवरावांची प्रकृती क्षयाने ढासळल्याने एकदाच त्या प्रकृती पाहण्यासाठी आल्या होत्या असे दिसते. त्यांनी पुत्रावरील आपला राग व हेका शेवटपर्यंत सोडला नाही. करारी आई आणि कर्तव्यकठोर चिरंजीव असे इतिहासातील हे एकमेव उदाहरण !

सन्दर्भ :
- पुण्यातील वाडे आणि वास्तू ( डॉ. एच. वाय. कुलकर्णी )

Instagram : TRAVELWALA.CHORA

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...