Skip to main content

तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे ) / Tulshibaug Shree Ram Temple, Budhwar Peth ( Pune )


तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे )

पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते. या सांस्कृतिक राजधानीचे जे अलंकार आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाण. येथील रामाचे मंदिर व परिसर हे आजही अनेकांना कायम खुणावत असते. हे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी.


नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. त्यांचे मूळ आडनाव ' खिरे ' होते. यांचे वडील सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाचे जोशी-कुलकर्णी. श्री रामदास समर्थांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या पाडळी येथे नारो आप्पाजी यांचा जन्म झाला. नारो अप्पाजींचे मूळ नाव नारायण असे होते व मुंज होईपर्यंत त्यांचे वास्तव्य पाडळी येथेच होते. त्यामुळे रामोपासनेचा वसा त्यांना लहान वयातच मिळाला असावा. एक दिवस नारो आप्पाजी आई वर रुसून पुण्याला आले व तिथेच त्यांची गोविंदराव खासगीवाले यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी खासगीवाले यांनी लहानग्या नारायणास आश्रय दिला जिथे आता सद्य राम मंदिर आहे. त्या काळी या जागेत श्री खासगीवाले यांची तुळशीची बाग होती. तेथून लहानग्या नारायण श्री खासगीवाले यांना तुळशी तोडून आणून देत असे. पुढे हीच जागा त्याने विकत घेतली व तिथे राम मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे.


नारो आप्पाजी पुढे स्वकर्तृत्वावर मोठ्या नावारूपास आले. जमा, खर्च व महसूल या विषयांत त्यांनी मोठे काम केले. १७५० साली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारो आप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. निजामाने पुण्यावर जेव्हा हल्ला केला तेव्हा मोठ्या हुशारीने नारो आप्पाजी यांनी पुणे वाचवले आणि या हल्ल्यात अस्ताव्यस्त झालेल्या पुण्याला पूर्वपदावर आणायचे काम सुद्धा नारो आप्पाजी यांनीच केले. नारायण पेशव्यांची हत्या, सास्टीची लढाई आदी संकट काळात नारो आप्पाजी मोठी कामगिरी पार पाडली.

पेशव्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व घरगुती संबंध होते. पेशव्यांच्या खासगीतील महत्वाची कामे ही त्यांनी पार पाडलेली दिसून येतात.


इ.स. १७६१ मध्ये नारो आप्पाजी यांनी राम मंदिराची स्थापना केली. पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच नारो आप्पाजी यांनी फेब्रुवारी मार्च महिन्यात ( शके १६८३ माघ ) राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. त्यासाठी आसपासची जागा ही विकत घेतली. इ.स. १७६३ नोव्हेंबर मधे ( शके १६८३ माघ ) देवळाचा उंबरा मुहूर्ताची बसवण्यात आला. २ वर्षांनी म्हणजेच १७६५ च्या नोव्हेंबर मधे ( शके १८८५ मार्गशीर्ष ) राम , लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती घडवण्यात आल्या.या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडवल्याबद्दल त्यांना ३७२ रुपये देण्यात आले ( तेव्हा सोने १५ रुपये तोळा होते ).


रामासमोरची प्रसिद्ध काळ्या पाषाणातील दास मारुतीची मूर्ती बखतराम पाथरवट गुजराथी यांनी घडवली. त्यास ४० रुपये खर्च आला. इ.स. १७६७ मधे मारुतीच्या मूर्तीस झिलई देऊन देऊळ बांधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यास ५२ रुपये खर्च झाल्याची नोंद हि इतिहासात मिळते. पुढे ४ वर्षांनी गणपती व पार्वती यांच्या मूती नारायण पाथरवट यांच्याकडून करवण्यात आल्या. रामासाठी मुकुट, कुंडलं, कंठी असे १११८ रुपयाचे दागिने नारो आप्पाजी यांनी करून घेतले. नारो अप्पाजींचा राम भक्तीचा वारसा त्यांच्या वंशजांकडेही आल्याने त्यांच्या वंशजानीही प्रेमाने रामासाठी दागिने करून घेतले.


राम मंदिर पूर्ण होण्यास बराच कालावधी लागला. एकूण खर्च १३६६६७ रुपये इतका झाला. त्यापैकी मंडपास ५१२० रुपये, ओवऱ्यास ६३४ ९ रुपये आणि वृंदावनास १५८ रुपये खर्च झाले. उत्तरेकडील भागात राहण्यास हा वाडा बांधण्यात आला. हे काम नारो आप्पाजी यांचे चिरंजीव रामचंद्र यांच्या काळात पूर्ण झाले. देवस्थानास इनामे ही प्राप्त झाली. खड्याच्या लढाईसंदर्भात केलेल्या नवासानुसार सवाई माधवराव पेशवे यांनी उत्तरेकडील दरवाज्यावर नगारखाना आहे तिथे चौघडा सुरु केला.


तुळशीबाग मंदिराचे आवार एकूण एक एकर आहे. उत्तर दक्षिण-पश्चिम अशा तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सध्या असलेला सभामंडप इ.स. १८८४ मधे नंदराम नाईक यांनी बांधला व पूर्वीच्या शिखरावर उत्तुंग असे वैशिष्ट्यपूर्ण शिखर बांधले ज्याची उंची ७५ फूट असून शिखरावर कोनाडे आहेत ज्यात देवता, साधू संत व पेशवेकालीन व्यक्तींच्या मूर्ती आहेत. शिखरावरील कळस ४ फूट आहे. असे शिखर पुण्यात दुसरीकडे कुठेच नाही. सभामंडप २० फूट उंचीचा असून त्यात ३ दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. मंडपाची लांबी ६० फूट व रुंदी ४० फूट आहे . मुख्य मंदिराभोवती गणपती, दत्त, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव, मारुती व शेषशाई ही मंदिरे आहेत. यातील शेषशाईची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेषशाईसमोर कोनाड्यात महादेव, गरुड, मुरलीधर यांच्या मूर्ती आहेत. येथील मुख्य उत्सव म्हणजेच रामनवमीचा उत्सव जो आजही प्रसिद्ध आहे. पेशवाई काळात अनेक मंदिरे उभारली गेली. कालौघात बऱ्याच मंदिराचे स्वरूप बदलले परंतु तुळशीभग राम मंदिर आजही जुन्या स्वरूपात भव्यता टिकवून आहे. रामोपासनेची पताका आजही येथे डौलाने फडकत आहे.

सन्दर्भ :
लेखन - श्री. मंदार लवाटे
प्रकाशक - श्री रामजी संस्थान, तुळशीबाग - पुणे

Instagram : @TRAVELWALA.CHORA

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...