Skip to main content

प्राचीन पुणे / Ancient Pune


प्राचीन पुणे
 
आपण राहतो ते गाव किती जुने आहे हे प्रत्येक गावकऱ्याने माहिती करून घेतलेच पाहिजे , कारण त्या गावाचा वारसा आपण पिढ्यान्पिढ्या जपतो. जसे एखाद्या देवळात गेल्यावर क्षेत्रमाहात्म्य सांगितले जाते आणि ते आपण भक्तिभावाने ऐकतो , तसेच आपले गाव हे आपल्याच नव्हे , तर आपल्या पूर्वजांचेही कार्यक्षेत्रच. त्या क्षेत्राचा महिमा , त्याचे महत्त्व आणि माहात्म्य आपणालाच माहिती नसेल तर येणाऱ्या पिढ्यांना काय समजणार. म्हणूनच ज्या पुण्यात आपण राहतो , त्या पुण्याची , पुण्याच्या इतिहासाची थोडी माहिती करून घेणे आवश्यक आहे . त्रिखंडात गाजलेले पुणे , जरी पेशव्यांच्या काळापासून भरभराटीला आले असले , तरी पुण्याला प्राचीन इतिहासाचे अधिष्ठान आहे . या इतिहासाची पूर्वपीठिका अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून आहे. काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या परिसरात नदीच्या पात्रात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली , तेव्हा पुण्यात आदिमानवांची वस्ती असावी असा तर्क गृहीत धरून शोध घेण्यास सुरुवात झाली . पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कोरेगावातही अश्मयुगीन हत्यारे व साधने सापडली. काळ्या नक्षीमध्ये रंगवलेल्या चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे तिथे आढळले . शिवाय भांडी , बरण्या अशा वस्तूही सापडल्या. प्रवरा नदीकाठच्या नेवासे आणि बोरवे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तूंशी त्यांचे विलक्षण साम्य होते . एवढेच नव्हे , तर पुण्याच्या आजूबाजूला विशेषत : पंढरपूरनजीक भीमा नदीच्या काठच्या इटे या ठिकाणीही असेच अवशेष आढळले . यामुळे पुणे , कोरेगाव , इटे या ठिकाणी एकाच नदीच्या तीरावर समान संस्कृती नांदत असावी या तर्काला आधार मिळतो.

प्राचीन काळानंतरचे पुण्याच्या संस्कृतीचे पुरावे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील बौद्धकालीन अवशेषांमुळे दृढ होतात . या काळात बौद्ध धर्माचा प्रसार दक्षिणेत , विशेषत : महाराष्ट्रात , मोठ्या प्रमाणावर होत होता याला अन्य पुरावे आहेतच , तथापि पुण्याच्या परिसरातही त्यांनी खोदलेली लेणी आजही अस्तित्वात आहेत . सिम्बॉयसिसच्या टेकडीवरील गोखले स्मारकाच्या खालच्या बाजूस पांडवनगरमध्ये लेणेसदृष एक गुहा आहे . सध्या तिचे महादेव मंदिरात रूपांतर झाले आहे . परंतु ते बौद्धांचे खोदकाम आहे हे नीट बघणाऱ्याला समजेल . कालें , भाजे , शेलारवाडी , सासवड , पुरंदर या पुण्याच्या परिसरातही अशी बौद्ध लेणी आढळतात . पूर्वीच्या भांबवड्याजवळ म्हणजेच नंतरच्या भांबुरड्याजवळ आणि सध्याच्या शिवाजीनगरमधील भर वस्तीत जंगलीमहाराज समाधीपलीकडील पाताळेश्वर लेणे पुण्यातील प्राचीन वस्तीचा उपलब्ध पुरावा म्हणून मानता येईल . पुणे ते जुन्नर असा रस्ता होता आणि दळणवळणही होते असे या लेण्यांच्या ठिकाणावरून लक्षात येते . त्यामुळे पुणे हे मध्यवर्ती स्थानक असावे यात शंका वाटत नाही. पुण्यातील कसबा पेठेत , कसबा गणपती ते सात तोटी चौक या परिसरात चार ठिकाणी इमारतीचे पाये खणताना मातीच्या विटा , मडकी , भांडी , मणी इत्यादी गोष्टी सापडल्या . संशोधकांच्या मते त्या चौथ्या शतकातील आहेत . म्हणजेच , पुण्याची प्राचीनता ज्ञात इतिहासापेक्षा आणखी मागे जाते . इ.स. ४६५ मध्ये त्रैकूटक राजांच्या अमलाचा एक पुरावा सापडला आहे , तो म्हणजे पुण्याजवळच्या इंदापूर तालुक्यात कझाद या गावात , या राजांची काही नाणी सापडली . त्यामुळे पुण्यावर त्रैकूटकांची सत्ता होती असे म्हणता येते . सर्वांत जवळचा लिखित स्वरूपातील उपलब्ध पुरावा मात्र शके ६८० ( इ.स .७५८ ) या काळातील राष्ट्रकूट राजवटीतील ताम्रपटाचा आहे . पूगडी भट या ब्राह्मणास राष्ट्रकूट सम्राट कृष्ण याने बोपखल हे गाव , अश्विन अमावस्येच्या सूर्यग्रहणाचे दिवशी ( हेमंलबी संवत्सर ) इनाम दिले असा या ताम्रपटाचा अर्थ आहे . त्यात पुण्यविषयान्तर्गत बोपरखळुग्राम : यस्य पूर्वतो कलस :। दक्षिणत : नदी मूईला । पश्चिमत : दर्पपूडिका । उत्त ( र ) तो भेऊसरी ग्रामः । असा मजकूर असून पुण्याचा उल्लेख पुण्य - विषय असा स्पष्ट केला आहे . विषय याचा अर्थ आजच्या परिभाषेतील तालुका असे मानता येईल . यात उल्लेखलेली ठिकाणे आजही तशीच असून नावे फक्त रूपांतर होत किंवा अपभ्रंश होत बदलत गेली आहेत . तथापि ( कलस :) कळस , ( मुईला ) मुळा , ( दर्पपूडिका ) दापोडी , ( भेऊसरी ) भोसरी असे त्यांचे आजचे उल्लेख या ताम्रपटातली माहिती खरी आहे हे सांगण्यास पुरेसे आहेत.

नंतरच्या काळातील म्हणजेच शके ९ १५ ( इ. स. ९९३ ) मधील एक ताम्रपटही उपलब्ध आहे . शिलाहार राजांच्या राजवटीतील ' अपराजित ' राजाने क - हाडहून आलेला ब्राह्मण पूणक - विषयातील खेटक गावात राहत होता असेही त्यात म्हटलेले आहे . खेटक म्हणजे खेड ( राजगुरूनगर ) आणि पूणक म्हणजे पुण्य , पुणे , वैकूटक , राष्ट्रकूट , चालुक्य , शिलाहार अशा विविध राजवटी बदलत बदलत ११ व्या शतकात पुणे यादव राजांच्या आधिपत्याखाली आले . यादवसम्राट राजा रामचंद्र देव याचा पंतप्रधान हेमाद्री पंडित ऊर्फ हेमाडपंत याने प्रचलित केलेल्या बांधकाम शैलीतली अनेक देवळे महाराष्ट्रभर पसरली होती . त्यांतीलच एक म्हणजे पुण्यातील नागेश्वर मंदिर . सध्याचे बांधकाम हे पेशवेकालीन जीर्णोद्धारातले असले तरी नागेश्वर मंदिराचे उल्लेख प्राचीन काळापासून म्हणजेच तेराव्या शतकापासूनच होताना आढळतात . इ.स. १२ ९ ४ मध्ये दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाने दक्षिणेवर स्वारी करून , यादव साम्राज्य जिंकले . देवगिरी राजधानीचे दौलताबाद झाले . त्यानंतर तत्कालीन महाराष्ट्राचा सर्वच प्रदेश अमलाखाली घेत , इसवीसनाच्या चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्यावर मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला . पुण्याच्या परिसराचे पाच भाग होते . माळीची जमीन , मुजेरीची जमीन आणि पुणेवाडीची वस्ती आणि कुंभारी व कासारी या दोन कारागिरांच्या वस्त्या . त्यांना मोहतर्फा असे म्हणत .

या सर्वाच्या एकत्रीकरणातून पुणे नावाचे काहीसे मोठे गाव अस्तित्वात आल . या सर्व इतिहासातून एक गोष्ट लक्षात येते की , पुण्याला प्राचीन अधिष्ठान असले तरी ऐतिहासिक , सामाजिक , धार्मिक किंवा सांस्कृतिक कोणतेही महत्त्व नव्हते . या परिसरातले ते एक मोठे गाव होते , एवढेच . त्यामुळे आजूबाजूची चार गावे तसे पुणे होते , असे म्हणणेच योग्य ठरेल . आज या जुन्या पुण्याचे अवशेष शिल्लक नाहीत , परंतु एक गोष्ट मात्र अभिमानास्पद आहे ती म्हणजे , या ठिकाणी वस्ती करून राहणारी घराणी मात्र अजूनही वास्तव्यात आहेत . माळीचे पाटील ' लडकत ' , पुणेवाडीचे पाटील झांबरे , कुलकर्णी - राजषों , देशमुख - शितोळे , देशपांडे - होनप , सर्वांनीच आपल्या रूपाने पुण्यनगरीचा प्राचीन वारसा आत्मीयतेने जपला आहे , हेही नसे थोडके . पुण्यात या काळाच्या आधीपासून वास्तव्य असणारी आठ प्राचीन घराणी आहेत . ढेरे , शाळीग्राम , कानडे , वैद्य , कवलंगे , निलंगे आणि भाराईत अशी ती घराणी . यांपैकी कवलंगे , निलंगे आणि भाराईत यांचे वंश चालले नाहीत , त्यांचे उत्पन्न अनुक्रमे राजर्षी , धर्माधिकारी आणि माळी ( यांना ओतूरकर असेही नाव आहे ) यांच्याकडे वहिवाटीसाठी आले . या घराण्यांना ' आठघरे ' असे उपनाव आहे.

कसबा पेठेत मुजुमदार बोळात वैद्य यांचा वाडा होता . वैद्यांचे वारस अजूनही आठघरे वैद्य ' असे नाव चालवितात . साधारणत : सोळाव्या शतकापासून पुढील काळात महाराष्ट्रातील गावांच्या प्रतवारीचे निश्चित पुरावे आढळतात . त्यानुसार , मजरा म्हणजे अगदी लहान गाव किंवा छोटी वस्ती , मौजा म्हणजे त्यापेक्षा जरा मोठ्या वस्तीचे गाव , कसबा म्हणजे तालुक्याचे मुख्य व मोठे तालेवार गाव आणि शहर म्हणजे राजधानी किंवा त्या दर्जाचे गाव , अशा चार प्रतीत तत्कालीन गावे विभागली जात . मजरा व मौजा गावांसाठी आठवड्यातील एका वारी बाजार भरे . बाकी कारभार बलुत्यांच्या हातात होता . मात्र , कसबा गावाशेजारी एक किंवा जास्त कायमस्वरूपी बाजारपेठा वसवलेल्या होत्या व प्रत्येक बाजारपेठेत एका वारी आठवड्याचा बाजार भरे . शहराची बातच न्यारी . अनेक बाजारपेठा , राजवाडे , थोरामोठ्यांचे वाडे , हवेल्या , प्रशस्त रस्ते असे त्यांचे स्वरूप असे . भाग्याची गोष्ट म्हणजे , पुणे या सर्व प्रतवारीमधून , प्रगती करत करत १८ व्या शतकातील एक समृद्ध शहर झाले . १६ व्या शतकाअखेरीपर्यंत पुण्याला मौजा हाच दर्जा होता . सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे कसबा झाले . आजूबाजूला तीन कायमस्वरूपी बाजारपेठाही वसल्या आणि एकोणिसाव्या शतकाचे प्रारंभी पुणे , अठरा बाजारपेठा असलेले भरभराटलेले महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपाला आले होते.

सन्दर्भ :
- हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोवनी )

Comments

Popular posts from this blog

पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे - पुणे गणेशोत्सव 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darshan 14. Bholenath Mit

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या व

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस