Skip to main content

श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे / Shree Kesariwada Ganpati, Narayan Peth - Pune


श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे
( मनाचा पाचवा गणपती )

इ.स. १८९४ साली स्थापन झालेल्या केसरीवाडा गणपतीस थेट लोकमान्य टिळकांचा वारसा लाभला आहे. १९०५ साली नारायण पेठेतील श्रीमंत सरदार गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरी वाड्यात ( टिळक वाड्यात ) हा उत्सव साजरा होऊ लागला. तत्पूर्वी तो सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात साजरा होत असे. हा गणपती आधी गायकवाड वाड्याचा गणपती म्हणून ओळखला जात असे. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव ( १२५ वर्षे ) साजरा केला आहे. उत्सवी गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि सुंदर असते. गेली अनेक दशके मूर्तीच्या स्वरूपात बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले मूर्तिकार गोखले हे श्रींची मूर्ती साकारतात. उत्सवमूर्तीच्या मागे एक थोडी मोठी अलीकडील सहा हातांची चांदीची मूर्ती करण्यात आली. हा श्री गणेश महावैष्णव ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील वर्णनानुसार साकारलेली आहे. त्यामागे लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो. केसरी वाड्यात केसरी वृत्तपत्राचे कार्यालय आहे.

गणेशोत्सवादरम्यान अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी एकदा 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले होते. त्यांचे येथे व्याख्यान म्हणजे एक आकर्षण असायचे. लोकमान्य टिळकांनी केसरीतून गणेशोत्सवावर अग्रलेख सुद्धा लिहिले होते. न. चिं. केळकर, कृष्णाजीपंत खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, चि. ग. भानू, शि. म. परांजपे आदी थोर लोकांनी येथे व्याख्याने दिली आहेत. सामाजिक, राजकीय, आरोग्य, अध्यात्म अशा विविध विषयांवरील व्याख्यानांची ही परंपरा आजही कायम आहे. त्याचबरोबर अनेक थोर शास्त्रीय गायक-गायिकांनीदेखील या गणपतीपुढे आपली सेवा अर्पण केली आहे. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अरविंद गजेंद्रगडकर, प्रभा अत्रे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी आपली कला केसरीवाड्यात सादर केली आहे. आजही केसरी वाड्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना चोखंदळ पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

केसरीवाड्याचा गणपती स्थापनेच्या आणि विसर्जनाच्या वेळी पालखीतूनच आणला जातो व विसर्जनासाठी नेला जातो. ढोल-ताशा, नगारावादन अशा पारंपरिक वाद्यांची जोड मिरवणुकीत असतेच. कालौघात उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी केसरीवाडा गणेशोत्सवाने पारंपरिकता जपली आहे. २००२ सालापासून मंडळ विसर्जनास लक्ष्मी रस्त्यावरून न येता टिळक रस्त्यावरून जाऊ लागला. पुढे २०१२ सालापासून केसरीवाडा परत लक्ष्मी रस्त्याने विसर्जनास येऊ लागला. लोकमान्य टिळकांची चवथी पिढी मंडळाचा प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहे. मंडळ कुणाकडूनही देणगी घेत नाही. केसरीच्या निधीतून गणेशोत्सव साजरा केला जातो.

काही वर्षांपासून व्याख्यानांबरोबरच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी पाककला आणि पुष्प सजावट स्पर्धा असे अनेक उपक्रम मंडळातर्फे राबविले जातात. लोकमान्य टिळकांचा प्रबोधनाचा वारसा जपणारा, संस्कृती आणि परंपरेचं भान राखत उत्सव साजरा करत केसरीवाडा गणेशोत्सवाने आदर्श घालून दिला आहे. वर्षभर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. केसरीवाड्यातच लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. तेथे विंचूरकर वाडा व गायकवाड वाड्याचे छायाचित्र पहावयास मिळते. ते देखील गणेशभक्तांनी एकदा बघायला हवे.

सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक

Location :

Instagram :

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...