Skip to main content

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे / Shree Siddhivinayak Ganpati Mandir, Sarasbaug - Pune


श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे

पुणे शहर, पेशवे, आणि श्रीगणेश यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. नानासाहेब पेशवे म्हणजे पुणे शहराचे शिल्पकार. त्यांनी वाढत्या पुणे शहराची नियोजनबद्ध वाढ व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भरपूर मेहनत घेतली. त्यांनी इ.स. १७५५ ला पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्यावर दगडी धरण बांधून २५ एकर क्षेत्राचे मोठे तळे बांधले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. १७ महिने या तळ्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळेस तळे बांधकामास ४,९९, ५५३ रुपये इतका खर्च आला होता. 'पर्वतीचे तळे' म्हणून हे तळे प्रसिद्ध होते. तळ्याच्या भोवती हिराबाग, लोटणबाग सारख्या बागा निर्माण केल्या गेल्या. या नयनरम्य परिसरातील तळ्यात पेशवे नौकाविहार करण्यासाठी येत. अशीच एक तळ्यात छोटे बेट राखून तिथे त्यांनी एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. बागेचे नाव सारस नावाच्या पक्ष्यावरून 'सारसबाग' ठेवले गेले.

थोरले बाजीराव पुत्र नानासाहेब पेशवे (पेशवेपदावरील कारकीर्द - १७४० ते १७६१) यांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या नातवाने म्हणजेच श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी इ.स. १७८४ मध्ये एक दगडी मंदिर बांधले. तेथे उजव्या सोंडेच्या संगमरवरी गणेशाची स्थापना केली. ह्या सिद्धिविनायकाचे मंदिर तळ्यात असल्याने त्याचे नाव तळ्यातला गणपती असे रूढ झाले. अगदी आत्ताआत्तापर्यंत हे ठिकाण याच नावाने ओळखले जायचे. सध्याची आपण जी गणपतीची मूर्ती बघतो, ती स्थापनेपासूनची तिसरी मूर्ती आहे. गणपतीची मूळ मूर्ती १८८२ साली बदलण्यात आली. आज जी मूर्ती दिसते १९९० मध्ये बसविण्यात आली आहे. कमळावर बसलेली चतुर्भुज संगमरवरी गणेशमूर्ती येथे आहे. खालील उजव्या हातात माळ व डाव्या हातात मोदक आणि वरील दोन हातात शस्त्रे आहेत.

सवाई माधवराव पेशव्यांनी बांधलेले मंदिर आज अस्तित्वात नाही. ते १९३० पर्यंत होते. ३ डिसेंबर १९६९ साली नवीन मंदीराचा कोनशिला समारंभ पार पडला. गणपतीचे सध्याचे लाल दगडातले मंदिर हे इ.स. १९७७ साली बांधले आहे. पेशवाईनंतर आकाराने खूप मोठे असलेले पर्वतीचे तळे राहिले नाही. हा भाग दलदलीने भरून गेला होता. तेथे झोपड्यांचा प्रश्नही निर्माण झाला होता. पुढे पुणे महानगरपालिकेने तळ्याच्या जागेवर बाग तयार केली. पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील एक प्रसिद्ध आयुक्त म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे भुजंगराव कुलकर्णी (कारकीर्द सन १९६५ ते १९६९). त्यांच्या काळात मध्ये सारसबाग उद्यानाची निर्मिती झाली व येथे लोकांची वर्दळ सुरु झाली. एकेकाळी या परिसरात कोणी फिरकायचे नाही. बागेस "सारसबाग" असे विस्मरणात गेलेले जुने नाव दिले.

आजही जुन्या लोकांच्या तोंडी 'तळ्यातला गणपती' असेच नाव आहे. हिवाळ्यात बाप्पांचे टोपी व स्वेटर मधील रूप पाहण्यासारखे असते. पुणेकरांना सारसबागेची आठवण मात्र दिवाळीतच होते, असे म्हणावे लागेल. या मंदिराची व्यवस्था श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्याकडे आहे. पुणे शहराच्या वैभवात या गणपतीने व बागेमुळे मोठी भर पडली आहे.

सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक

Location :

Instagram :

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...