Skip to main content

श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे / Shree Parvati Nandan Ganpati ( Khinditala Ganapti ), Chattushringi - Pune


श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), 
चतुःश्रुंगी - पुणे

गणेशखिंडीत 'पार्वतीनंदन गणपती' किंवा 'खिंडीतला गणपती' हे एक प्राचीन देवस्थान आहे. गणपती खिंडीत असल्याने कदाचित त्याला खिंडीतील गणपती असे नाव पडले असावे. सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रस्त्याला ( गणेशखिंड रस्ता ) जेथे मिळतो तेथे हे मंदिर आहे. मंदिरास दगडी गाभारा, दगडी मंडप व लाकडी सभामंडप आहे. मंदिरात दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात २०-२५ माणसे मावतील एवढी जागा आहे. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे.

सुमारे ४०० वर्षांपासून गणपती अस्तित्वात होता असे म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाणला असलेल्या सोमेश्वर मंदिरात जात असताना इथे विसावल्या होत्या. तेव्हा येथील एका ठकार नावाच्या ब्राह्मणास दृष्टांत झाला की कसब्यात मी ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली आहे. उत्खनन करून तेथे गजाननाचा स्वयंभू तांदळा मिळाला. राजमाता जिजाऊ यांनी तेथे मंदिर बांधले. ते मंदिर म्हणजेच ग्रामदेव कसबा गणपती मंदिर. या मंदिरात साक्षात्कार झाल्यामुळे जिजाऊंनी कसबा गणपती मंदिर बांधले, असे सांगितले जाते. त्यांनी येथे विहीर खणून धर्मशाळा बांधली होती असे समजते.

पुढे पेशवाईत सिध्दपुरुष शिवरामभट चित्राव येथे पाषाणला वास्तव्यास होते. त्यांना मंदिराची दैन्यावस्था दिसून आली. म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार व विहिरीची साफसफाई करताना त्यांना विहिरीत गुप्तधन सापडले. हे गुप्तधन सरकार दरबारी घेण्यास पहिल्या बाजीराव पेशव्यांनी नकार दिला. म्हणून गुप्तधनातून या मंदिराचा जीर्णोद्धार व शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर उभारण्यात उपयोग झाला, अशीही एक आख्यायिका आहे. श्रीमंत पेशवे मोहिमेवर जाताना येथील गणपतीचे दर्शन घेत असत. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आहे...

गणपतीचे उल्लेख इंग्रजांच्या काळातही मिळतात. तेव्हा हा भाग शहराच्या वस्तीपासून लांबवर होता. त्यामुळे चापेकर बंधूंनी व सेनापती बापट यांनी ही जागा वापरली होती. अत्याचारी रँडची हत्या केल्यावर दामोदर चापेकरांनी त्यांचे सहकारी खंडेराव साठे यांच्यामार्फत 'खिंडीतला गणपती नवसाला पावला' असा सांकेतिक निरोप लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सर्व प्रांताचे व्यापारी पुण्यात येताना येथील रम्य परिसरात मुक्काम करीत असत. प्रसिद्ध असलेल्या ५६ विनायकांपैकी हा ५५वा विनायक होय.

१८८४ मध्ये रत्नागिरीच्या महादेव बर्वे यांनी सभामंडप दुरुस्त केल्याची नोंद आहे. चतश्रुंगी मंदिरापासून जवळ असलेल्या या मंदिराच्या पुनरुज्जीवनाची गरज निर्माण झाली.तेव्हा मंदिर संवर्धनाचे काम बाभळे गुरुजी व 'किमया'च्या कलमदानी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

या कामाची तपशीलवार माहिती २०१५ मध्ये युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कारासाठी पाठविण्यात आली. आणि पुरातन वास्तू जतनासंबंधीचा यूनेस्कोचा पुरस्कार या मंदिरास मिळाला. मंदिर ऐतिहासिक असूनही येथे गणेशभक्तांची पावले फारशी वळत नाहीत. त्यामुळे हे एक दुर्लक्षित वारसास्थळ आहे. बाभळे हे मंदिराची व्यवस्था पाहतात.

सन्दर्भ :
▪︎पुस्तक - पुण्याचे सुखकर्ता
▪︎लेखक - स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक

Location :

Instagram :

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...