Skip to main content

सुजाता मस्तानी, पुणे / Sujata Mastani, Pune


सुजाता मस्तानी, पुणे

पुणे आणि काही खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते असते. तो पदार्थ, तो निर्माता, तो दुकानदार याची एक स्वतंत्र ओळख असते.

आंबा म्हटले की जसा हापूसच डोळ्यापुढे येतो, तसेच मस्तानी म्हणजे सुजाता हे गृहीत सत्य झाले आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकात कोणे एकेकाळी रावजी मामा कोंढाळकर यांचे पानाचे दुकान होते आणि त्या दुकानात बर्फही मिळत असे; एवढाच काय तो या दुकानाचा थंडपणाशी संबंध होता. मात्र शरदराव कोंढाळकर, जे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते, त्यांनी या पानाच्या दुकानाशेजारचे एक बंद पडू लागलेले किराणामालाचे दुकान भाडय़ाने घेऊन त्या जागी थंड पेये आणि आइस्क्रीम विकायचा घाट घातला आणि १९६७-६८ मध्ये सुजाता या आपल्या मुलीच्या नावाने आइस्क्रीमचे दुकान सुरू केले. थोडय़ाच दिवसांत येथे आइस्क्रीम सोबत मस्तानीही मिळू लागली.

मस्तानी हा काही कोंढाळकर यांचा शोध नाही, तसा त्यांचा दावाही नाही. पूर्वी ‘दूध कोल्ड्रिंक’मध्ये आइस्क्रीम घालून हा पदार्थ विकला जात असे. मात्र त्यात बर्फ आणि साधे दूध व आइस्क्रीम यांचे मिश्रण असे. सुजाता दुकानाने यात बदल केले. बर्फाच्या जागी आइस्क्रीम, दूध साधे न वापरता दाट आटवलेले आणि वर आइस्क्रीमचा गोळा असे लोभस स्वरूप आणि जिभेवर रेंगाळणारी चव असणारे पेय तयार झाले.

अगदी आरंभी ३० पैसे आइस्क्रीम आणि ८० पैसे मस्तानी असा भाव होता. सुरुवातीस ‘रोझ मिल्क’ आणि त्यात तरंगणारा पिस्ता आइस्क्रीमचा गोळा असेच स्वरूप होते. मग नेहमीचे ग्राहक काही तरी वेगळे म्हणून विविध स्वरूपात मागणी करू लागले म्हणजे पिस्ता आंबा, रोझ आंबा, आंबा चॉकलेट आणि यातूनच विविध फ्लेवर्स तयार झाले. आइस्क्रीम करण्याच्या विविध प्रकारांपैकी पॉट आइस्क्रीम प्रकार सुजाताने स्वीकारला. दुधाचा वापर करताना ते आटवून घेणे आणि नैसर्गिक फळे किंवा त्याचा गर यांचाच वापर केल्याने एक उत्तम चव लोकांच्या जिभेवर आणि मनावर ठसू लागली आणि ‘सुजाता मस्तानी’ने जम धरला.

कालांतराने म्हणजे १९८० च्या सुमारास इमारतीचे नूतनीकरण आणि विकास झाला. सुजाताला आपली हक्काची मोक्याची आणि मोठी जागा मिळाली आणि मग काय, सगळे कुटुंबच यात गर्क झाले. नवी जागा, नवा थाट, नवनवीन प्रकार यामुळे कीर्ती दिगंत झाली आणि मे महिन्यात या चौकात रात्रीही ट्रॅफिक जॅम होऊ लागला.

आता विस्तार वाढला, माल निर्मितीसाठी दोन ठिकाणी कारखाने सुरू झाले. निंबाळकर तालीम येथे दोन दुकाने आणि शहरभर अन्यत्र २३ ठिकाणी सुजाता मस्तानी मिळू लागली. तरीही नैसर्गिक फळांचा, गराचा वापर, दूध आटवलेलेच वापरायचे याबाबत मालक मंडळी आजही आग्रही आहेत.

आता हा उद्योग एका कुटंबाचा राहिला नसून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा झाला आहे. शरदरावांची पुढची पिढी यात कार्यरत आहे. वाघोलीपासून खडकवासल्यापर्यंत आता सुजाता मस्तानी मिळते; ती हळूहळू पुणे जिल्हाभर कशी मिळेल याचा विचार सचिन कोंढाळकर करीत असतात.

सुजाता म्हणजे चव,
सुजाता म्हणजे ब्रँड, 
सुजाता म्हणजे मस्तानी... ❤️

माहीती आभार :
लोकसत्ता टीम

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...